जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२४
राज्याच्या राजकारणात आता मोठ्या हालचाली सुरु झाल्याअसून अनेक पक्षात बंडखोरी देखील सुरु झाली आहे. नुकतेच रत्नागिरातील भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सिल्लोड मतदारसंघातील भाजपचे नेते सुरेश बनकर यांनीही हाती शिवबंधन बांधले. बनकर हे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात उभे राहणार आहेत.
काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिटोप्लास्टी करण्यात आली होती. अँजिओप्लास्टीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोर आले असून अॅक्शन मोडमध्ये पहायला मिळत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यंतरी हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले होते, पण हरामान घालवायचे असल्यामुळे आराम तरी किती दिवस करणार, असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली. दीपक साळुंखे आणि राजन तेली यांच्या पक्षप्रवेशामुळे कामाला मुहूर्त चांगला मिळाला आहे. यंदाची निवडणूक सोपी नाहीये. दीपक साळुंखे शिवसेनेत आले म्हणजे आपला विजय नक्की हे माहीत आहे. पण तुम्ही आजपासून मतदारसंघातील घराघरांत आपली मशाल पोहोचवली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
खोकेवाले मशाल आणि धनुष्यबाण यामध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शिवसेनेची निशाण मशाल असून ती घराघरांत न्यावी लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. दीपक साळुंखे यांच्या हातात मशाल दिली आहे, त्या मशालीची धग दाखवून द्यायची आहे. मतदारसंघात सभेला आल्यानंतर सविस्तर बोलेन, असेही ठाकरे म्हणाले. सांगोल्याचा निवडून आलेला आमदार जरी गद्दार झाला, तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहात हे दाखवून द्याल आणि आपला आमदार निवडून आणाल अशी खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.