
ठाणे : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये (Shivsena) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. 40 आमदारांसह 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल असा इशारा दिला होता. यावेळी बोलताना त्यांनी दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असेही शिंदे म्हणाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचे पडसाद सध्या ठाणे शहरात उमटत आहेत. धर्मवीरांसोबत नेमंकं काय झालं? याचा उलगडा झाला पाहिजे अशा आशयाचे बॅनर ठाण्यात झळकले आहेत.
ठाण्यातील चंदनवाडी भागात मनसैनिक महेश कदम यांनी हे बॅनर लावले आहेत. 26 ऑगस्ट 2001 नक्की आमच्या धर्मवीरांचं काय झालं? घात कीअपघात ?लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत खूप काही झालं. सिनेमा हे फक्त उदाहरण आहे. दिघे यांच्या जीवनामध्येही ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. मी योग्य वेळी नक्की बोलेन,” असे एकनाथ शिंदे मालेगाव येथे भर सभेत म्हणाले होते.





















