जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद जवळील सिमेंट फॅक्टरीच्या जवळ रेल्वे पुलावर जळगावकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दोन मालवाहू वाहनांवर भुसावळ करून येणारा भरधाव ट्रक धडकल्याने चौघे जागीच ठार झाले. अपघात इतका भयंकर होता की, मालवाहू वाहनातील नागरिक उड्डाण पुलावरून खाली कोसळले तर ट्रक उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढलेला होता.
बुधवारी पहाटेच्या ६ ते ७ वाजेच्या सुमारास नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर भयंकर अपघात झाला. जळगावकडून बुधवारी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप क्रमांक एमएच.४३.एडी.१०५१ व एमएच.४३.बीबी.००५० हे भुसावळच्या दिशेने जात होता. सिमेंट फॅक्टरी ते डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयजवळ रेल्वे उड्डाणपुलावर वळणावर समोरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमपी.०९.एजी.९५२१ ने त्यांना जोरदार धडक दिली.
दोन्ही मालवाहू चक्काचूर झाल्या असून एक मालवाहूची ट्रॉली ट्रकला चिकटली होती. मयत आणि दोन्ही जखमींना तात्काळ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक किरण मोरे, उपनिरीक्षक राजू साळुंखे, महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक निरीक्षक सुनील मेढे, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, किरण हिवराळे, अनिल सपकाळे, पवन देशमुख, हितेश पाटील, दीपक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. तसेच क्रेनच्या साहाय्याने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
