
जळगाव : प्रतिनिधी
शिवाजी नगरातील मुख्य रस्त्यावर रस्त्यांपेक्षा खड्डेजास्त झाल्याने पावसाळ्याच्या पाण्यामुळे हे खड्डे पूर्णपणे पाण्याने भरुन जात असल्याने येथून जाणारे येणारे नागरिक याठिकाणी खड्ड्यात पडत आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजेपासून छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाने येथील रस्त्यावर ठिय्या देवून प्रशासनाला बोलविण्याची विनंती पोलिस अधिकाऱ्यांनी केली.
या परिसरातील खड्ड्याबाबत छत्रपती शिवाजी नगरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासन व खा.उन्मेशदादा पाटील, आ.राजुमामा भोळे तर स्थानिक नगरसेवकांनाही निवेदने देवून पाठपुरावा केला परंतु कुठलीही याठिकाणी उपाययोजना होत नाही तर फक्त आश्वासन येथील नागरिकांना भेटत असल्याचाही आरोप येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे.
सकाळी 10 वाजेपासून हे आंदोलन नागरिकांनी सुरु केले होते. या आंदोलनात घटनास्थळावर 70 ते 80 नागरिक दिसून येत होते. यावेळी नागरिकांकडून मनपा प्रशासनासाठी बोंबा मारूनही आंदोलन केले. हे प्रथमच नागरिकांकडून करण्यात आलेले आंदोलन असल्याने चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी नागरिकांनी रस्त्याचे पूजनही केले. या आंदोलनात राजु सपकाळे, निशांत काटकर, भगवान सोनवणे, विजय राठौड यांच्या नेतृत्वात विजय बांदल, विनायक पाटील, अंकुश कोळी, नवल सपकाळे, राजु चौरे, राजु सनद, जगदीश नागला यांच्यासह परिसरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.





















