
जळगाव मिरर | १ जून २०२५
राज्यातील पुणे शहर गेल्या काही महिन्यापासून अनेक घटनामुळे चर्चेत येत असतांना आता पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कारने चहाच्या टपरी जवळ उभे राहून चहा पिणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना चिरडले आहे. यात एकूण 12 विद्यार्थी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. यांच्यावर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आज या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे.
अपघात इतका भीषण होता की चार जणांचे पाय मोडले आहेत, तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता त्याने मद्यप्राशन केले असल्याचे समोर आले आहे. मद्यपान करून चालक हा गाडी चालवत होता. गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट या विद्यार्थ्यांच्या अंगावर गेली. जयराम मुळे असे या चालकाचे नाव आहे. च्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 125(अ), 125(ब), 289 अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदर अपघात सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या अपघातामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलनाझ सिराज अहमद जखमी झाले.
या भीषण अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधला. तसेच विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. पुण्यातील आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करत या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का, यावर चर्चा केली. तसेच या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत, याचा सर्व खर्च शासन करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पेरूगेट परिसरात सायंकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे श्री नाथसाई अमृततुल्य हॉटेलबाहेर अनेक विद्यार्थी चहासाठी थांबले होते. पावणेसहाच्या सुमारास हा परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला असतानाच अचानक एक धक्कादायक घटना घडली. जंगम महाराज मठाकडून भरधाव वेगाने येणारी एक खासगी प्रवासी टॅक्सी अचानक वळण घेण्यासाठी डावीकडे – अखिल सदाशिव पेठ नवरात्र मंडळाकडे वळली. मात्र, त्या ठिकाणी रस्ता आधीच अरुंद आणि त्यात निम्मा रस्ता विद्यार्थ्यांनी व्यापलेला असल्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक दाबण्याऐवजी कारचालकाचा पाय चुकून थेट अॅक्सिलरेटरवर गेला आणि हा अपघात घडला. घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता, काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे.