
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
वरणगाव येथून जवळ असलेल्या पिंपळगाव खुर्द येथील श्रीराम नगरमध्ये विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धिरज कोळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धिरज हा पिंपळगाव येथील हरी किटकुल बढ़े प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. दि. १ रोजी दुपारी सुमारे १ वाजता तो घरात एकटाच होता. त्यावेळी घरच्या नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी त्याने इलेक्ट्रिक मोटार प्लगमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्लग जोडत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसल्याने तो जागीच कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी धिरजचे आई-वडील शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणीही नसल्याने काही वेळ ही बाब लक्षात आली नाही. नंतर शेजाऱ्यांना प्रकार समजताच धाव घेण्यात आली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
धिरजच्या पश्चात आई-वडील, आजी आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. तो स्वभावाने अत्यंत नम्र, मैत्रीशील आणि अभ्यासात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अचानक निधनाने शिक्षक व सहपाठी हादरले असून, शाळेत शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, घरगुती विद्युत उपकरणे वापरताना आवश्यक सुरक्षितता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिकांनी कुटुंबीयांना धीर देत प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.




















