जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२३
देशातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा हाहाकार सुरु असतान एक खळबळजनक घटना गुजरातच्या खेडा जिल्ह्यातून समोर आली आहे. खोकल्याचे विषारी औषध प्यायल्याने ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कफ सिरपची विक्री करणाऱ्या दुकानदारासह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ सिरफ घेतल्यानंतर या लोकांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मृत व्यक्ती खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील बिलोदरा गावातील रहिवासी आहेत. खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका दुकानातून खोकल्याचे सिरप घेतले होते. औषधाचे सेवन करताच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे या रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असताना दोन दिवसांत ५ जणांचा मृत्यू झाला. अजूनही दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या कफ सिरपमध्ये मिथाईल अल्कोहोल असल्याचे या नमुन्याच्या तपासणीत आढळून आले.
या घटनेनंतर पोलिसांनी औषध विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आपल्याकडून ५० हून अधिक लोकांनी औषधाची खरेदी केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली काही लोक नशा करण्यासाठी कफ सिरपचा वापर करतात. त्याच्या अतिसेवनाने देखील मृत्युचा धोका संभावतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.