
जळगाव मिरर | २४ जुलै २०२५
देशभरातील महत्त्वाच्या खटल्यांचे नेतृत्व करणारे सुप्रसिद्ध सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. 13 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली असून, आज त्यांनी संसद भवनात मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.
शपथविधीच्या वेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “आजचा दिवस आनंदाचा आहे. मराठी माणसांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल आभार. हे प्रेम कायम राहो. उज्ज्वलजींची राजकीय वाटचाल सुरू झाली याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”
उज्ज्वल निकम हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले सरकारी वकील मानले जातात. ते मूळचे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत. उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेले निकम यांनी एलएलबीचे शिक्षण जळगावात पूर्ण केलं.
त्यांनी आपल्या वकिलीच्या कारकिर्दीला जळगाव जिल्हा न्यायालयात सुरुवात केली आणि पुढे तिथेच सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. अंबरनाथ बॉम्बस्फोट खटल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने मोठा अनुभव मिळाला. पण त्यांच्या कारकिर्दीतला खरा टर्निंग पॉइंट ठरला तो 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे.
13 मार्च 1993 ला, मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. बॉम्बब्लास्टशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 100 पेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या खटल्यामुळेच, उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते मुंबई असा प्रवास सुरू झाला. उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केले होते. या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात विशेष कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं. 14 वर्षांनंतर 2007 मध्ये खटल्याचा निकाल लागला. 123 आरोपींपैकी 100 आरोपी दोषी ठरले आणि 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हा खटला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक दीर्घकालीन खटला ठरला.




















