
जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२५
जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसलेली मंगला एक्सप्रेस हळू झाल्याने रेल्वेतून उतरतांना अॅड. वर्षा साहेबराव गायकवाड या डोक्यावर पडल्या. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भोईटे नगरात राहणार अॅड. वर्षा बिऱ्हाडे या जळगाव व कल्याण येथे प्रॅक्टीस करत होत्या. त्या गुरुवारी मुंबईहून मंगला एक्सप्रेसने जळगावला येत होत्या. परंतु त्या एक्सप्रेसला जळगावला थांबा नसल्याने ती जळगाव स्थानकावरून स्लो जात असताना काही प्रवाशी चालत्या रेल्वेतून उतरले. त्यांचे पाहून अॅड. बिऱ्हाडे या देखील उतरत असताना त्यांचा तोल जावून त्या फलाट क्रमांक तीन वर डोक्यावर पडल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण व मुलगा असा परिवार आहे.




















