
जळगाव मिरर | २६ मार्च २०२६
नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवले आहे. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि फसवणुकीच्या जाळ्यातून मालमत्ता हडपणारा अशोक खरात आता सर्वांच्या लक्षात आला आहे. पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे की, खरातने भीती आणि अंधश्रद्धेचा वापर करून स्वतःसाठी मोठे साम्राज्य उभे केले होते.
काही राजकीय नेते त्याच्या भेटीसाठी जात असत, तर काहींच्या घरी त्याचे येणे-जाणे होत असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या संदर्भातील फोटो आणि कागदपत्रे समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरावणारा प्रश्न उपस्थित केला आहे – “राजकीय वरदहस्तामुळे खरात इतका मोकाट वागत होता का?”
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत प्रखर शब्दांत आपली भूमिका मांडली. “अशोक खरातला मारून टाकून मोकळे व्हावे, या प्रकरणावर चर्चा करू नये,” असे भिडे गुरुजी म्हणाले. त्यांचा हा दृष्टिकोन असा आहे की, समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नसावे आणि वेळ घालवून चर्चा करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी संपवणे हेच एकमेव उपाय आहे.
खरातच्या वैयक्तिक इतिहासाकडे पाहिले तर त्याचा प्रारंभिक जीवन संघर्षही धक्कादायक आहे. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत दहावीपर्यंत शिकत असताना त्याचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. घरून अंडी चोरून ती शाळेत विकणे, तसेच ‘कोंबडी चोर’ किंवा ‘मोटर चोर’ म्हणून हिणवले जाणे ही त्याची बालपणीची काही घटना आहेत. त्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये हमाल म्हणून काम करणारा खरात काही वर्षांनी गावात परतल्यावर स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेऊ लागला. सामाजिक संघटनांनीही पीडितांना न्याय मिळवण्यासाठी एल्गार पुकारला असून, समाजमन आता प्रचंड आक्रमक झालं आहे. अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात अध्यात्म आणि फसवणूक याबाबतच्या चर्चेला नविन वळण दिले आहे.




















