जळगाव मिरर | 24 ऑगस्ट 2026
चोपडा शहरातील मल्हारपुरा परिसरातील १५ वर्षीय विद्यार्थी दि.२३ रोजी मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. हाशीम अरमान खाटीक असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हाशीम अरमान व खाटीक हा त्याचे दोन वर्गमित्र प्रसाद वासुदेव मराठे (१५, रा. पाटील गढी, चोपडा) आणि शेख अबू सिद्दीक कलीम (१५, रा. के.जी.एन. कॉलनी, जमजम पार्क, चोपडा) हे तिघेही वेले या गावाकडे फिरायला गेले होते तेथून शहरातील – धनवाडी फाट्या जवळील पाटचारीत पाणी पाहून ने त्यांचा पाण्यात पोहण्याचा मोह झाला. यावेळी . मयत हाशीम व प्रसाद मराठे हे दोघेही पोहता येत नसताना मोठ्या पाटचारीच्या पाण्यात उतरले तर सोबत असलेला शेख अबू सिद्दीक कलीम हा मात्र पाण्यात उतरला नाही. पाण्यात उतरल्यानंतर हशीम पाण्यात बुडत आल्याचे लक्षात येताच मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांकडेही मदतीसाठी विनंती केली.
यावेळी परिसरातील काही आदिवासी तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मयत हाशीमला पाण्यातून वर काढले. तातडीने १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावण्यात आली व त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे मल्हारपुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हाशीम व प्रसाद हे लहानपणापासून वर्गमित्र असून दोघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. हाशीमचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. तीन मित्रापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीय व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेप्रकरणी तपास पोलिस करत आहेत.
मयत हशीम व प्रसाद याला मी सांगितले की, तुम्ही पाण्यात जाऊ नका. तुम्हाला पोहता येत नाही. पण त्या दोघांनी सांगितले की हात पाय धुवून परत येतो. परंतु दुर्दैवाने हशीमला पाण्याचा अंदाज आला नाही तो जास्त पाण्यात उतरला आणि त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला तर सुदैवाने प्रसाद कमी पाण्यात असल्याने वाचला असल्याचे शेख सिद्दीक कलीम याने सांगितले.
मयत हशीम तसेच प्रसाद मराठे व शेख सिद्दीक कलीम हे तिघेही वर्ग मित्र असून शहरातील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत आहेत. यातील प्रसाद आणि हशीम हे दोघे इयत्ता पहिली पासून सोबत आहेत. यात आपला लहान पणाच्या मित्राचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने प्रसाद भावुक झाला होता.




















