जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२५
शहरातील इच्छादेवी चौक परिसरातील घराच्या वरच्या मजल्यावर गेलेल्या रामकृष्ण छबू वैराट (वय २७) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. काही तरुणांकडून रामकृष्ण याला धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या भावाने केला.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ईच्छा देवी चौकात राहणारा रामकृष्ण वैराट हा तरुण मजुरी काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. दि. ५ रोजी रात्री तो घराच्या वरील मजल्यावर गेला होता. त्याठिकाणी त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळाने त्याचे वडील त्याला जेवणासाठी बोलवायला गेले असता, मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे.
रामकृष्ण वैराट या तरुणाला काही जणांकडून धमक्या दिल्या जात होत्या. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या भावाने केला आहे. याबाबत आपण पोलिसांकडे फिर्याद देणार असल्याचेही त्याने सांगितले.