जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२६
मुंबईतील सुशील रहेजा नामक एका अमराठी बांधकाम व्यावसायिकाने मराठी तरुणाला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली असून, याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. “तुम घाटी लोग सुधरोगे नही” असे अपमानास्पद उद्गार काढत मराठी तरुणावर हात उचलण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त करत, गरज पडल्यास रस्त्यावरचा न्याय आपल्या पद्धतीने केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने अमराठी व्यक्तीची महापौरपदी निवड केल्यानंतर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा वाद टोकाला गेला असतानाच मुंबईतील या घटनेमुळे वातावरण अधिकच तापले आहे. अमराठी बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी सत्ताधारी भाजपवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसलेला नाही, तरीही मुंबईतील मराठी माणसाची ही अवस्था आहे. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना काळे म्हणाले, “मीरा-भाईंदरला मेहता महापौर आणि मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण—या घटना केवळ सूचक नाहीत, तर ही धोक्याची घंटा आहे. आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो, हे आता पाहायचे आहे.”
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली असून, अन्यथा “रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच,” असा थेट इशाराही गजानन काळे यांनी दिला आहे. या घटनेमुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ऐरणीवर आला आहे.





















