जळगाव मिरर | २८ मार्च २०२४
यावल शहरातून टाकरखेडा जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने यावल रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता तिघांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात हलवले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल ते टाकरखेडा रस्त्यावर बुधवारी सायंकाळी दुचाकीने भालशिव येथील मुकुंदा गंगाराम सोनवणे (वय ३२), नितीन हिरालाल तायडे (वय ३३) व शरद सोपान कोळी (वय ३३) हे जात होते. दरम्यान टाकरखेडा गावाजवळील वळणावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुजाकीला जबर धडक दिली. या अपघातात हे तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना घटनास्थळावरून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले, तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, आधिपरिचारीका मंजूषा कोळेकर, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलिसात बुधवारी रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवण्याचे काम सरू होते.