जळगाव मिरर । १७ सप्टेंबर २०२५
एमआयडीसीमध्ये कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना दि. १३ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सुरुवातीला पोलिसात अनोळखी असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपासून मुलगा घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी तो हरविल्याची तक्रार पोलिसात दिल्यानंतर त्याची ओळख पटली. आकाश सुरेश सपकाळे (वय २६, रा. कांचननगर, ह. मु. प्रजापत नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जळगाव ते भादली दरम्यान असलेल्या अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२०/३० च्यामध्ये दि. १३ रोजी रेल्वेच्या धडकेत ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासधिकारी पोहेकॉ प्रदीप नन्नवरे हे सोशल मीडियासह शहरात बेपत्ता असलेल्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत होते.
तालुका पोलीस ठाण्यामध्ये दि. १५ रोजी आकाश सुरेश सपकाळे हा तरुण बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती प्रदीप नन्नवरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच सपकाळे कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बोलावले. त्याठिकाणी मयताच्या अंगावरील शर्ट व त्याच्या हातावर गोंदलेल्या आई नावावरुन आकाशच्या काकांसह भावाने त्याची ओळख पटवली.
आकाश सपकाळे हा दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आईला एमआयडीसीत कामावर जातो असे सांगून घरातून निघाला होता. परंतु रेल्वेच्या धडकेत त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन दिवस झाले तरी तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेवून अखेर तालुका पोलिसात हो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.