जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२५
राज्यात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना ममुराबाद येथील एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पाळधी-तरसोद दरम्यान गिरणा नदीवरील नव्याने उभारलेल्या पुलाजवळ विसर्जनासाठी गेलेल्या गणेश गंगाराम कोळी (वय २७) या तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, गणेश आपल्या कुटुंबासोबत घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी सहाच्या सुमारास नदीकाठी गेला होता. विसर्जनासाठी नदीत उतरल्यावर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडू लागला. त्याचे कुटुंबीय व इतरांनी आरडाओरड करून वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रवाह प्रचंड असल्याने त्याला वाचवता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ व पोलिसांनी शोधमोहीम राबवली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला गेला, मात्र यश आले नाही. रविवारी सकाळपासून आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी आणि कानळदा परिसरात शोध सुरू ठेवण्यात आला आहे. गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. पाटबंधारे विभागाकडून धरणाचे सहा दरवाजे उघडले गेले असून ९,७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या धरणात ९६ टक्के पाणीसाठा असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे चाळीसगाव येथील उपअभियंता यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन केले आहे. गणेश कोळीच्या अचानक जाण्याने ममुराबाद गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांसह संपूर्ण गाव दुःखात बुडाले असून, त्याच्या मृत्यूने गणेशोत्सवातील आनंद क्षणात दुःखात बदलला आहे.