
जळगाव मिरर | १३ मे २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता अमळनेर तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमळनेर-धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्यापासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी घटना १२ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील जानवे येथील भाग्यश्री दीपक पाटील ही तरुणी आपल्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोटरसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर येत असे. तिला रात्रीचीही कधी भीती वाटली नाही. धाडसी कन्या भाग्यश्रीमुळे दीपक पाटील याने व्यवसायात वृद्धी केली होती. दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून तिच्या वडिलांचा अपघात झाला होता.
डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवायला बंदी घातली होती. नेहमीप्रमाणे भाग्यश्री १२ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर (क्रमांक एम एच १९ ,ई बी ६०२७) दुधाचे कॅन घेऊन अमळनेर येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळल्याने खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता. भूषण पाटील यांनी जानवे गावात माहिती कळवल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखाण्यात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटरसायकलवर दूध वाहता वाहता भाग्यश्रीने जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. आठ दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागून भाग्यश्री उत्तीर्ण झाली होती. तिला पोलीस खात्यात जायचे होते. मात्र काळाने स्वप्नपूर्तीपूर्वीच तिला हिरावून नेले.