
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा एक भाग म्हणून राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना हिंदीचा केवळ मौखिक अभ्यास करावा लागेल, असे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. या स्पष्टीकरण नंतर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे चांगलेच संतापले आहेत.
या संदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांना पहिलीत पाठवा, ते तिथेही नापास होतील. हे सरकार चालवत आहेत की, कॉमेडी शो चालवतात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून सरकारच्या या भूमिकेवर कडक शब्दात टीका केली आहे.
या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत! आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास!!! हे सरकार चालवताएत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही ‘नापास’ होतील!’
राज्य सरकारच्या वतीने त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या आधी राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी तर उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. दोन्ही ठाकरे बंधू जर मोर्चा काढणार असतील तर एकत्र का नाही? असा प्रश्न त्यामुळे राज्यात विचारला जात होता. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शाळात हिंदी विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे निश्चित झाले आहेत.





















