इंटेलिजन्स ब्युरोने १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलिसांना १० पानी अहवाल सादर करण्यात आला असून, त्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIS ने दोन्ही दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना हल्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दहशतवादी हल्ला होऊ शकतो
15 ऑगस्टला हल्ला करण्यासाठी दहशतवादी UAV म्हणजेच मानवरहित हवाई वाहने आणि पॅराग्लायडरचा वापर करू शकतात, असे आयबीचे म्हणणे आहे. त्यामुळे बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या अहवालात दिल्लीतील ज्या ठिकाणी सर्वाधिक रोहिंग्या राहतात त्या ठिकाणांवर कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांना कट्टरपंथी गटांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हत्यांचा उल्लेख
IB ने आपल्या अहवालात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नुकतीच झालेली हत्या आणि उदयपूर, अमरावती येथील घटनांचा उल्लेख केला आहे. दिल्ली पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. लाल किल्ल्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लाल किल्ल्यावर सर्वसामान्यांच्या प्रवेशावर अधिक कडक असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा अमृतोत्सव
यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. केंद्र सरकारने 15 दिवसांच्या कार्यक्रमात ‘हर घर तिरंगा अभियान’ सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत यंदाचा स्वातंत्र्यदिन खास असणार आहे.