जळगाव मिरर | ६ मे २०२५
१० वर्षे वय असतानाच आईचे निधन झाले व त्यापूर्वीच वडील घर सोडून गेलेले. असे असले तरी शिक्षणाची आवड जपण्यासह यश मिळविण्याची जिद्द ठेवलेल्या लक्ष्मी विलास शिंदे या अनाथ मुलीने इयत्ता बारावीची परीक्षा ५० टक्क्यांसह उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, लहानपणापासून मुलींचे निरीक्षण गृह व नंतर शासकीय आशादीप वसतिगृहात राहून तिने शिक्षण घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातीलच रामेश्वर कॉलनीमधील असलेली लक्ष्मी ही आई, वडील व दोन भावांसह राहत होती. मात्र, ती लहान असतानाच तिचे वडील घर सोडून निघून गेले. त्यामुळे तिन्ही भावंडांच्या शिक्षणासह त्यांच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. आईने घर सांभाळणे सुरू केले, त्यात तिलाही दुर्धर आजार जडला व त्या माउलीने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे तिघे भावंडे अनाथ झाली. लक्ष्मी मुलींच्या निरीक्षण गृहात तर दोघे भाऊ मुलांच्या निरीक्षण गृहात पोहोचले.
लक्ष्मी १८ वर्षांची झाल्याने तिची मुलींच्या निरीक्षण गृहातून शासकीय आशादीप वसतिगृहात रवानगी करण्यात आली. तेथेही तिने अभ्यास सुरू ठेवला व इयत्ता बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल सोमवारी (५ मे) लागला आणि लक्ष्मी उत्तीर्ण झाली.
