
जळगाव मिरर | ९ मार्च २०२६
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याने रामेश्वर कॉलनीतील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिसरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आमदार राजूमामा भोळे यांना निवेदन देत इशारा दिला आहे. येत्या २३ मार्च २०२६ पर्यंत प्रलंबित समस्या सोडवण्यात ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिक ‘जिवंतपणी तिरडीवर झोपून अंत्ययात्रा’ काढत अनोखे आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आमदारांनी रामेश्वर कॉलनीला भेट देऊन परिसरातील प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीला बराच काळ लोटूनही अनेक मूलभूत समस्या अद्याप प्रलंबितच आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप वाढत असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
रामेश्वर कॉलनीतील रहिवाशांनी आपल्या निवेदनात पाच महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यानुसार एमआयडीसी भूखंड क्रमांक डी-४५/२ येथून कामगारांना जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मेहरूण परिसरातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे, गट क्रमांक २५० मधील हनुमान मंदिराजवळील खुल्या जागेचे सुशोभीकरण करणे, Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या स्मारकासाठी जागा राखीव करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे आणि गट क्रमांक २४९ मधील एमडीएस कॉलनीतील शिवदत्त मंदिराजवळील खुल्या जागेला संरक्षण भिंत बांधणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला अंतिम मुदत दिली आहे. “आम्ही आपल्या आश्वासनांवर विश्वास ठेवला होता; मात्र आता संयम सुटत चालला आहे,” अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली. जर २३ मार्च २०२६ पर्यंत मागण्यांवर ठोस कार्यवाही झाली नाही, तर जळगाव शहरात ‘जिवंतपणी तिरडीवर झोपून अंत्ययात्रा’ काढत अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यांनी दिले निवेदन
या निवेदनावर ज्ञानेश्वर आर. पाटील, संदीप प्रकाश मांडोळे, विशाल गोपाळ पाटील, महेश वासुदेव माळी, सचिन वाघ, भाऊसाहेब पाटील, उमेश खांबेटे, एस. आर. जगताप, संजय सपकाळे, हर्षल वाणी आणि नंदू पुरोहित यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





















