जळगाव मिरर | २८ जून २०२५
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या पत्नीला मारहाण करत विवाहितेचा विनयभंग केला. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २३ रोजी घडली असून या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय शेतकरी हे दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. २२ जूनला रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते तीनचाकी स्कूटीवरुन त्यांच्या गोठयाकडे जात होते. या वेळी गावातील एका व्यक्तीला त्यांनी रस्त्यावर झोपण्यासाठी टाकलेली खाट बाजुला करण्यास सांगितले. त्यावर हा रस्ता तुझ्या बापाचा नाही, अशी अरेरावीची केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. दरम्यान, २३ रोजी सांयकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दिव्यांग शेतकरी व त्यांच्या पत्नी घरात बसल्या होत्या.
याच वेळी गावातील व्यक्तीचा मुलगा सागर पाटील, भोला पाटील हे घरात शिरले. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करुन दिव्यांग शेतकऱ्याला मारहाण केली. त्यावेळी त्यांच्या पत्नीने पतीला त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केली असता त्यांनाही त्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर गावातील लोकांनी भांडण सोडवले. तर घरातून जाताना त्यांनी तुम्ही जर पोलिसांमध्ये आमच्या विरुध्द तक्रार दिली तर तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही, मारुन टाकु अशी धमकी दिली. याप्रकरणी दिव्यांग शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून सागर पाटील, भोला पाटील या दोघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
