
जळगाव मिरर / २७ ऑक्टोबर २०२२
महाराष्ट्रातून एक लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरुन गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता टाटा एअरबस हा २२ हजार कोटींचा प्रकल्प देखील गुजरातमध्ये नेण्याला गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे.
महाराष्ट्रातील मेगा प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प जेव्हा गुजरात सरकारनं महाराष्ट्रातून घेतला. त्यानंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्पही नागपूरच्या मिहानमधून गुजरातमध्ये हालवण्यात आला आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलाच्या C295 मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी उद्घाटनं होणार आहे, असा आरोप तपासे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे.@NCPspeaks@BJP4India @BJP4Maharashtra #NCP #Maharashtra #Gujarat #EknathShinde #BJP #ModiGovt #VedantaFoxconn #C295 pic.twitter.com/EcwpvMO5mf
— महेश तपासे (@maheshtapase) October 27, 2022
“खरतरं या सर्व प्रश्नांची उत्तर भाजपनं दिली पाहिजेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी सर्वात आधी आम्ही आवाज उठवला आणि ते खरं ठरलं. त्यानंतर ‘बल्क ड्रग्ज पार्क’ हा प्रकल्पही गुजरातमध्ये गेला अशा किती गोष्टी तुम्ही तिकडे नेत आहात? खरंतरं हे सरकार कोणाच्या हिताचं आहे? कोणासाठी ते काम करतंय? या गोष्टी महाराष्ट्राला दिवाळखोरीकडं नेणाऱ्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा अजेंडा काय आहे? त्यांना वरुन जे दिलं जात ते फक्त वाचायचं. वरुन जे सांगितलं जात तेच करायचं. मंत्रिमंडळाचा विस्तारच काय कुठलाही अधिकारी नेमायचे अधिकार या शिंदे गटाला नाहीत. हे सरकार तरी आता टिकणार आहे का?” असे अनेक सवाल शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस पार्क हा प्रकल्पही गुजरातला पाठवला. आता टाटा एअरबस हा महाराष्ट्रात क्रांती घडवणारा प्रकल्प होता जो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला, तो देखील शिंदे सरकारनं गुजरातला पाठवून महाराष्ट्राचं भलं केलं आहे, अशा शेलक्या शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान साधलं.
महाविकास आघाडी सरकारचं अपयश – भाजप
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “ज्यावेळी महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रात होतं तेव्हा या प्रकल्पाबाबत त्यांनी एकतरी फॉलोअप केल्याचं पत्र आहे का? त्यामुळं याबाबत मविआचे नेते जे यावरुन टीका करताहेत त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील जनतेशी माफी मागितली पाहिजे”





















