जळगाव मिरर । ५ जानेवारी २०२३
गेल्या दोन दिवसपासून खान्देशात थंडीने मोठे थैमान घातले आहे. त्यामुळे दुपारपर्यत सुद्धा थंडीचा तडाखा असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. गुजरातकडून थंड वारे वेगाने राज्यात दाखल झाल्याने थंडी अधिकच वाढली आहे. मागील महिनाभरातील गरमीच्या वातावरणानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात थंडी वाढली आहे. 9 जानेवारीला किमान तापमान 10 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र सध्या राज्यात पाऊस आणि थंडीचा दुहेरी खेळ रंगलेला आहे.
कमाल तसेच किमान दोन्हीही तापमानात कमालीची घट तसेच चढउतार होत असल्याने वातावरणही झपाट्याने बदलत आहे. नाताळानंतर राज्यातील काही भागातील थंडी कमी झाली होती. पण गेल्या दोन दिसांपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक-नगर, पुणे-औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
थंड हवा तब्बल 11 किमी प्रतितासाचा वेग घेत आपल्याकडे दाखल होत आहे. यामुळे अचानक 3 जानेवारीपासून तापमानात मोठा बदल झाला. नववर्षाच्या सुरुवातीला थंडी राहणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, 3 तारखेनंतर वातावरणात बदल झाला.
