जळगाव मिरर | १८ मार्च २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरात महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. यात काही पोलिस जखमी झाले असून स्थानिक नागरिकांचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चांगलेच संतापले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नागपूरमधील हिंसाचाराची सविस्तर माहिती दिली. तसेच ही घटना पूर्वनियोजित कट असून जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही. राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवानही त्यांनी केले आहे.
नागपूरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे नारे देत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी प्रतिकात्मक कबर जाळली होती. याप्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होते. मात्र, सायंकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळी आंदोलकांकडून जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. हे वृत्त पसरल्यानंतर नमाज आटोपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी सुरु केली. आम्ही आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा त्यांनी सुरु केली. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांना पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांची तक्रार पोलीस ऐकून घेत होते. तेव्हा हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन दगडफेक सुरु केली. त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती. या जमावाने हंसापुरीत 12 दुचाकींचे नुकसान केले. काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर भालदारपुरा भागात सायंकाळी 7 :30 वाजता 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुर आणि सौम्य बळाचा वापर केला. यावेळी जमावाने एक क्रेन आणि काही चारचाकी वाहने जाळली.
या सगळ्यात एकूण 33 पोलीस जखमी झाले. यामध्ये तीन उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तर एकूण पाच नागरिक जखमी झाले. यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. दोन जण रुग्णालयात आहेत, त्यापैकी एकजण अतिदक्षता विभागात आहे. एकूण 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर शहरात एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.