जळगाव मिरर | ४ मे २०२५
चोपडा तालुक्यातील रामपूरा येथील ११ मजुरांना ऊसतोडीच्या कामासाठी पंढरपूर तालुक्यात नेण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याकडून ऊसतोडीसह इतर बांधकाम कामांसाठी जबरदस्तीने मजुरी करून घेतली जात होती. मजुरांनी मोबदला मागितल्यावर त्यांना धमकावले गेले व त्यांच्यावर नजर ठेवून जबरदस्तीने काम करवून घेतले जात होते.
या अन्यायाविरोधात मंगलबाई प्रकाश भिलं व सुनंदा हिम्मत भिलं या मजुरांनी जन साहस संस्थेच्या कामगार हेल्पलाईनवर संपर्क साधत मदतीची मागणी केली. त्यानंतर जन साहस संस्थेने तातडीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यांच्या निर्देशानुसार RDC साहेबांनी तातडीने सोलापूर आणि पंढरपूर प्रशासनाशी संपर्क केला.सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलिस आणि कामगार विभागाचे अधिकारी तसेच जन साहस संस्थेचे प्रतिनिधी – निलेश शिंदे, सय्यद रुबीना, ॲड. सी. एस. परमार, हितेंद्र माळी, सोनम केदार, उमा गायकवाड आणि विक्रम कल्याणकर – यांनी संयुक्त कारवाई करत मजुरांची सुटका केली.
पंढरपूर SDM कार्यालयात मजुरांचे जबाब व पंचनामे घेऊन बंधपत्रित कामगार कायद्यानुसार ६ कामगारांना अधिकृत ‘रिलीज सर्टिफिकेट’ देण्यात आले. त्यानंतर कामगारांना जळगाव जिल्हाधिकारी, RDC व विधी सेवा प्राधिकरण येथे भेट घालून त्यांच्यासाठी पुनर्वसनाच्या शासकीय योजनांवर चर्चा करण्यात आली.
सुटका करण्यात आलेले मजूर पुढीलप्रमाणे: 1. रूपाबाई ब्रिजलाल भिलं (३८) 2. स्वप्नील ब्रिजलाल भिलं (१७) 3. विक्की ब्रिजलाल भिलं (१५) 4. सुरेश रतन भिलं (३०) 5. उषाबाई सुरेश भिलं (२५) 6. कुणाल सुरेश भिलं (७) 7. शिव सुरेश भिलं (४) 8. ऋतिका सुरेश भिलं (२) 9. पिरण रतन भिलं (२६) 10. गणेश मानसिंग भिलं (२२) 11. कविता गणेश भिलं (२०) सर्व मजूर सुखरूपपणे आपल्या गावी परतले असून, या प्रकरणातून बंधपत्रित मजुरीविरोधातील जनजागृती व तत्काळ कारवाईचे महत्त्व अधोरेखित झाले आहे
