
जळगाव मिरर | ५ मार्च २०२६
कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुपरी-इंगळी रस्त्यावर बुधवारी (४ मार्च) संध्याकाळी विजेचा तीव्र धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोठ्यात बैल धुत असताना वाहन सर्व्हिसिंग मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुपरी येथील खेमलापुरे यांच्या सुमारे शंभर जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे संध्याकाळी बैल आणि म्हशी धुण्याचे काम सुरू होते. यावेळी खेमलापुरे यांचे भाचे धीरज सहदेव नाईक आणि कामगार भगवान खंडू सोनवणे हे वाहन सर्व्हिसिंग मशीनच्या सहाय्याने जनावरे धुत होते.
मात्र अचानक त्या मशीनमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही उपचारासाठी हुपरी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये भगवान खंडू सोनवणे आणि धीरज सहदेव नाईक यांचा समावेश आहे. रात्री उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.





















