
जळगाव मिरर | २० मार्च २०२६
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून सेवा बजावलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.
कोविड-१९ महामारीदरम्यान साई मॅन पॉवर सर्विसेस या कंपनीमार्फत कंत्राटी स्वरूपात कक्षसेवक पदावर अनेक कामगारांनी सेवा बजावली होती. जीवाची पर्वा न करता कोविड बाधितांची सेवा करताना काही कामगारांना स्वतःलाही कोरोनाची लागण झाली होती. अत्यंत धोकादायक परिस्थितीतही या कामगारांनी कर्तव्य पार पाडले.
मात्र कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या कंत्राटी कामगारांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे वर्ग-३ व वर्ग-४ पदांसाठी कंत्राटी भरती स्मार्ट कंपनीमार्फत करण्यात आली. या प्रक्रियेत अनुभवी जुन्या कामगारांना डावलून इतरांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे अनेक कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या हक्कांवर गदा आल्याचे समितीने नमूद केले आहे. तसेच कोविड काळात बेड सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आया, ॲम्बुलन्स चालक, सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगार म्हणून सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या अनुभवाच्या आधारे पुन्हा नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात १८ मार्च २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा संघर्ष समितीचे निलेश बोरा, बबन सावळे, निलेश तायडे, रवींद्र कोळी, प्रशांत सोनवणे, विनोद सपकाळे आणि विलास तायडे उपस्थित होते. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















