
बालचित्रकार अभिराज निकमच्या ‘यथार्थ’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी घोषणा
जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२६
जळगाव शहरात मोठ्या शहरांच्या धर्तीवर भव्य आर्ट गॅलरी व कला संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. बालचित्रकार अभिराज निकम यांच्या ‘यथार्थ’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, “अभिराज हा केवळ रंग भरत नाही, तर भावना आणि वास्तवाला आकार देतो. अशा गुणी कलाकारांना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे. हा बालचित्रकार राज्यात नव्हे तर देशात जळगावचे नाव उज्ज्वल करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी अभिराजच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल बोलताना त्याच्या आई-वडिलांचे तसेच गुरु चित्रकार सचिन मुसळे यांचे अभिनंदन केले. माझ्यासह शासन अश्या कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बालचित्रकार अभिराज निकम यांच्या कलेने भारावून गेलेल्या पालकमंत्र्यांनी त्याला वैयक्तिक पातळीवर सहकार्य करत त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला. यावेळी अभिराजनेही आपल्या कुंचल्यातून साकारलेले पालकमंत्र्यांचे चित्र भेट देत भावनिक कृतज्ञता व्यक्त केली.
पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीत आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी शहरात स्वतंत्र कला संकुलाची गरज व्यक्त केली. त्यांच्या या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या सहकार्याने कला संकुल उभारण्याची घोषणा केली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक विष्णूभाऊ भंगाळे यांनी महापालिकेकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अभिराज निकम हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी असून तो चित्रकार सचिन मुसळे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. सध्या पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या या प्रदर्शनात त्याच्या विविध चित्रांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मुसळे यांनी केले, तर सूत्रसंचालन अक्षय नेहे यांनी केले. आभार प्रदर्शन अभिराज निकम यांनी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर मनोज चौधरी, महिला आघाडी संपर्कप्रमुख सरिताताई कोल्हे-माळी, नगरसेवक गणेश सोनवणे, हर्षल मावळे, ॲड. दिलीप पोकळे, अक्षय नेहे, तसेच अभिराजचे वडील मनोज निकम व आई शीतल निकम यांच्यासह कला रसिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















