जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२५
जळगाव शहरातील अनेक भागात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच प्रतिक हरिदास निंबाळकर (वय २८, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर मारेकरी तिथून लगेच पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता शाहू नगरात घडली. भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक चार वर्षापासून कारागृहात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा याचा ८ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री अकरा वाजता इंद्रप्रस्थ नगरात खून झाला होता. या गुन्ह्यात प्रतिक याला ९ नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजता कारागृहातून सुटका झाली. भाऊ वैभव निंबाळकर याच्यासोबत दुचाकीने घरी येत असताना नूतन मराठा महाविद्यालयाच्या समोरील गल्लीतून शाहू नगराकडून जात असताना चार जणांनी दुचाकी अडवून प्रतीकवर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात जबर मार बसल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. तो मृत झाला असे समजून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. भावाने त्याला नजीकच असलेल्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र त्यांनी तेथून शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने रिक्षातून त्याला जीएमसीत हलविण्यात आले. त्याची कवटी फुटली असून डोक्यावर खोलवर जखमा आहेत. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकिय सूत्रांनी दिली.
प्रतिक याचा जामीन झाल्याची कुणकाला लागल्याने मारे कव्यांनी त्याच्यावर कारागृहापासून काही जणांनी पाठलाग केला. नूतन मराठा महाविद्यालयाच्या समोरील गल्लीत पोहचताच त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पाडले. आणि हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक भरत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, संजय हिवरकर आदींसह फॉरेन्सिक पथक दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी जीएमसीत येऊन जखमीच्या नातेवाईकांची भेट घेतली. हा हल्ला भूषण सोनवणे याचा मामा देविदास उर्फ आबा सैंदाणे, भूषणचा भाऊ वैभव व देविदासचा मुलगा अशा तिघांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रतिक याला ९ नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याची जालना कारागृहात रवानगी झाली होती. ५ डिसेंबर २०२२ रोजी त्याला जळगाव कारागृहात वर्ग करण्यात आले होते.