
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२६
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोविली गावाजवळील रायता पुलावर सकाळी सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रवासी घेऊन निघालेल्या ईको कारला समोरून येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने कारमधील मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रियेसाठी पाठवले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 11 पैकी 6 जणांची ओळख पटली असून उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “राष्ट्रीय महामार्ग 61 वर झालेली ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी म्हटले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






















