
जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२६
दिल्ली येथील भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता नेहरु नगर परिसरात घडली. हा अपघात रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्न ात हा अपघात झाल्याची समजते.
दिल्ली येथील भाजपचे खासदार मनोज तिवारी हे पा-रोळा येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा असल्यामुळे जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना एस्कॉर्ट वाहन पुरवण्यात आले होते. खासदार तिवारी यांना संभाजीनगरच्या हद्दीत सोडून हे एस्कॉर्ट वाहन जळगावकडे परत येत असताना मेहरुण तलावाजवळील नेहरुनगर जवळ हा अपघात घडला. रस्त्यावरील एक मोठा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षावर जावून आदळले.
या भीषण अपघातात रिक्षेचा अक्षरशः चक्काचूर झाला असून पोलीस वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये ज्योती एकनाथ बारी (वय ४५), एकनाथ रामदास बारी (वय ५०), अश्विनी शुभम कुमावत (वय २५), रत्ना शंकर मिस्तरी (वय ४८), सुशीला दिलीप बा-री (वय ५५), कीर्ती शिवाजी बारी (वय ४०), कुणाल शिवाजी बारी (वय १३) आणि ४ वर्षांची चिमुकली प्रियांशी शुभम कुमावत यांचा समावेश आहे. हे सर्वजण जळगावमधील हरी विठ्ठल नगरचे रहिवासी आहेत. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी खासदारांच्या ताफ्यातील परतीच्या प्रवासातील वाहनाचा हा अपघात असल्याचे सांगितले. तसेच जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, खराब रस्ते आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळेच हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.




















