
जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत असतांना आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच, शिंदे गटावर सडकून टीका करत त्यांना ‘काळे मांजर’ असे संबोधले. शिवाय धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी पक्षाच्या शाखा भेटी सुरू केल्या आहे. आज त्यांनी मुंबईतील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मतदारयादील घोळ आणि शिंदे गटावर टीका केली.
गेले दोन तीन वर्ष सतत प्रसारमाध्यमांतून येते की, इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे धक्का. एकदा जाऊनच बघू किती धक्के बसलेत. असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेकजण गेले. पण शिवसेनेला कुठेतरी कदाचित धक्का बसला असेल, पण धोका झालेला नाही. अनेकांनी धोके देण्याचे अनेक प्रयत्न केले. यानंतही ते होतील. पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे. तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.
गणेशोत्सवाच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी गणपतीच्या चरणी प्रार्थना केली. “आम्ही हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन पुढे जात आहोत. वाटेत स्वतःला वाघ म्हणवणारे अनेक काळे मांजरे आडवी येतात. गणराया, त्या अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर त्यांचा बंदोबस्त करायला आम्ही शिवसैनिक आहोतच,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला.
आता गणपती उत्सव आहे. त्यानंतर पितृपक्ष येईल. पितृपक्ष मी आपलाच मानतो. कारण माझा पक्ष हा पितृपक्षच आहे. शिवसेनेची स्थापना माझ्या पित्यानेच केलेली आहे. ज्यांच्याकडे काही आगा-पिछा नाही, त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. पितृपक्षानंतर नवरात्र सुरू होईल. म्हणता म्हणता निवडणुका येतील. म्हणून आजपासूनच मतदारयाद्यांची तपासणी सुरू करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन करत, मतदारयाद्या तपासण्याचे महत्त्वाचे काम दिले. आपल्या वॉर्डात मतदारयादीत मतचोरी होते का? मतचोर घुसलेत का? प्रत्येक गटप्रमुख आणि प्रत्येक कार्यकर्त्याने बघायचे आहे. घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही, ते बघा. नाहीतर, निवडणुकीच्या दिवशी आपल्यात जे मतदार नाहीत, त्यांच्या नावाने बोगस मतदान होते. काही ठिकाणी दुबार, तिबार मतदान होते. आता डोळ्यात तेल घालून घरोघरी मतदारयादी तपासा, असा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 40-42 लाख बोगस मतदार घुसवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. हे घुसलेले कोण आहेत? ते बघा. त्यांना मतदान करू देऊ नका. आगामी निवडणुकीत आपल्या बाजुने मतांचा पाऊस कसा पडेल ते बघा, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.




















