
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना शिंदे गटात काही नवनिर्मिती होते की काय अशी चर्चा पुन्हा रंगली आहे. परंतु उदय सामंत यांनी युतीच्या चर्चेचे वृत्त फेटाळून लावले आहे.
शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर बाहेर आल्यावर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, मी सकाळी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरेंना फोन केला, तेव्हा त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी बोलावले. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मी केवळ चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, आमच्यात राजकारण सोडून इतर विषयांवर चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आमच्यात चर्चा झाली असती तर मी तसे सांगितले असते. राज ठाकरे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडे आहेत. त्यामुळे सगळ्याच भेटींकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. आता इथून मी मुक्तागिरीवर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे मी आता राज ठाकरे यांचा संदेश घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे, असा अर्थ काढू नका, असेही उदय सामंत यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा गेल्या आठवड्यात रंगल्या होत्या. त्यावर अद्यापही कोणाकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशी युती होणार अशी शक्यता महाराष्ट्रात अनेकांनी वर्तवली होती. यावर परदेशवारीहून आल्यावर बोलू असे राज ठाकरेंनी म्हटले होते. परंतु अद्याप त्यांनी युतीवर काही भाष्य केलेले नाही. त्यात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा भेटी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.




















