
जामनेर : प्रतिनिधी
येथून जवळ असलेल्या डोहरीतांडा येथे आपल्या स्वत:च्याच बहिणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी या खटल्याचा निकाल अत्यंत जलदगतीने जामनेर न्यायालयाने लावून आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील डोहरीतांडा येथील एकाने २५ मार्च २०२२ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास फिर्यादी व आई झोपलेली असताना आरोपी उदयसिंग धीरसींग राठोड याने दारूच्या नशेत येऊन तिचा विनयभंग केला. यावर त्याच्या बहिणीने आरडाओरड केल्यानंतर त्यांची आई उठली व तिने फिर्यादीस आरोपीचे तावडीतून सोडवले असता आरोपीने धमकावले. आपल्यासोबत मनासारखे न केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी त्याने दिली.
या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे सदर खटल्यात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. या कामी फिर्यादी व तिची आई यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर खटल्यात युक्तिवाद करताना सरकारी वकील यांनी न्यायालयाय सागितल की अत्यंत घृणास्पद असा अपराध आरोपीने केलेला असून त्यास जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जेणे आरोपी पुन्हा असे कृत्य करण्यास धजावणार नाही व समाजातही याचा योग्य संदेश जाईल.
दरम्यान, या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश दि. न. चामले यांनी आरोपी उदयसिंग धीरसिंग राठोड याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. लक्षणीय बाब म्हणजे या खटल्याचा निकाल अवघ्या २ महिने १२ दिवसात लागला आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. कृतिका भट यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल निलेश सोनार यांनी मदत केली. या गुन्हयाचा तपास पो.हे.कॉ. साहिल तडवी यांनी केला होता.




















