
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. आज सकाळी मुक्ताईनगरात महिलेचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी एका महिलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली आहे.
तर मृतदेह काढण्याचे काम शेवटचे वृत्त हाती आले तोवर सुरूच होते.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात खूनाच्या सातत्याने घटना घडत आहेत. यात जळगाव शहरात दोन हत्या झाल्या असून यावल तालुक्यात दोन, चाळीसगावा एक खून झाले आहेत. या पाठोपाठ आता मुक्ताईनगर तालुक्यात हत्या झाल्याने परिसर हादरला आहे.




















