
जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५
गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. ठाण्यात 4 तासांत 31.22 मिमी पावसाची नोंद झाली, तर सकाळी 11 ते 12:30 दरम्यान 16.26 मिमी पाऊस पडला. यंदा ठाण्यात 1,947 मिमी पावसाची नोंद आहे. ठाणे आणि नवी मुंबईत 18 व 19 ऑगस्टला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सखल भागात पाणी साचल्याने ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला.
मुंबईत गेल्या 6 तासांत 170 मिमी पाऊस पडला, चेंबूरमध्ये सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद आहे. पावसामुळे 14 ठिकाणी मुंबई लोकलची वाहतूक मंदावली, परंतु ती बंद झालेली नाही. पुढील 10-12 तास मुंबईत तीव्र पाऊस अपेक्षित आहे. संध्याकाळी 6:30 नंतर हायटाइडमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दुपारी 4 नंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या शाळांच्या सुट्टीबाबत संध्याकाळी अलर्टच्या आधारे निर्णय होईल.
मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या मुखेडमध्ये पूरामुळे 50 म्हशी दगावल्या. बीड, नांदेड आणि लातूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. 57 मंडळांत अतिवृष्टी झाली असून, पूरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि मिलिट्री पथके तैनात आहेत. पुण्याहून 20 जणांची टीम नांदेडला पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे. अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके कार्यरत असून, पर्जन्य जलवाहिन्या आणि सांडपाणी व्यवस्थेवर लक्ष आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन आहे. आपत्कालीन परिस्थितीत 1916 वर संपर्क साधावा.




















