जळगाव मिरर | ३० जून २०२५
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वातील राज्यसरकारने हिंदी सक्ती करण्याचे शासन निर्णय मागे घेतले. पण त्यानंतरही राजकीय वर्तुळात त्याचे वातावरण तापले असून भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी आहे. त्यांना मराठीचा एवढाच पुळका होता, तर त्यांनी स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात का शिकवली? असा सवाल त्यांनी या प्रकरणी ठाकरेंवर शरसंधान साधताना उपस्थित केला आहे.
नारायण राणे आपल्या एका पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदी भाषेच्या वादावरून विविध प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रनेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले?
मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?
मराठीबद्दल इतकेच प्रेम होते, तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
