अहमदाबाद ; वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन होईल, असा अहवाल गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. यंदाच्या वर्षाखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सध्या अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) जोमाने कामाला लागला आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. केजरीवार यांनी रविवारी राजकोट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला. त्यांनी गुजरातमध्ये ‘आप’चा विजय होईल, असा दावा केला. Intelligence Bureau ने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात, गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येईल, असे म्हटले आहे. ‘आप’चे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. आपण खूप कमी जागांनी पुढे असणार आहोत. आपल्याला मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी गुजरातच्या जनतेने भाजपला एक मोठा धक्का देणे गरजेचे आहे. जेणेकरून आप बहुमताने सरकार स्थापन करु शकेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पडद्यामागे एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गुप्त बैठक होत आहेत. भाजप या अहवालामुळे घाबरला आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सध्या माझ्यावर टीका करत आहेत. काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, भाजपने त्यांना काँग्रेसमध्येच राहण्यास सांगितले आहे. भाजपला काँग्रेसच्या माध्यमातून विरोधकांच्या मतांचे विभाजन करायचे आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेस आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष संपला आहे. काँग्रेसचे जे १० आमदार जिंकतील, तेदेखील निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करतील. गुजरात एका मोठा स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे. जनतेने ही संधी वाया घालवू नये. जे नागरिक भाजपवर नाराज असतील त्यांनी आम आदमी पक्षाला मत द्यावे, असे आवाहन अरविंद केजरीवार यांनी केले.