
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
राज्यातील धाराशिव जिल्ह्यातून एक थरारक घटना उघडकीस आली आहे. भावजयीमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याच्या रागातून गवळेवाडी (ता. तुळजापूर) येथील शंकरेश्वर माने (वय अंदाजे २५) यांनी आपल्या सख्ख्या भावाच्या १३ महिन्यांच्या मुलीचा क्रूर खून केला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने मुलीला शेतात नेऊन तिचा गळा आवळून ठार केले आणि नंतर कोयत्याने तिचे सात तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून शेताजवळील नाल्यात पुरल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गवळेवाडी येथील २२ वर्षीय विवाहिता २२ फेब्रुवारीला प्रियकरासोबत पळून गेली होती. याप्रकरणी तिच्या पतीने तामलवाडी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. पोलिस महिला व तिच्या प्रियकराचा शोध घेत होते. त्याच दरम्यान २७ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास विवाहितेची १३ महिन्यांची मुलगी घरातून गायब झाली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली.पोलीस चौकशीत विवाहिता बावी (ता. तुळजापूर) येथे सापडली; तिने मुलगी आपल्याकडे नसल्याचे सांगितले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध चिमुकली पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला गेला.
पोलीस तपासात मुलीचा काका शंकरेश्वर माने याच्यावर संशय आला. ताब्यात घेऊन खाक्यांनी दाखवताच त्याने १३ महिन्यांच्या पुतणीचा खून केले असल्याची कबुली दिली. त्यानुसार, भावाची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने कुटुंबाची बदनामी झाल्याचा राग अनावर झाला होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी पहाटे मुलगी उचलून शेतात नेली, तिचा गळा आवळून ठार केले आणि नंतर कोयत्याने सात तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून नाल्यात पुरल्याचे कबुल केले. तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
चिमुकलीचा खून करताना गावातील एका व्यक्तीने आरोपीला बघितले होते. त्याने ताबडतोब पोलिसांना माहिती दिल्यामुळे ही क्रूर घटना उघडकीस आली. या प्रकरणामुळे गवळेवाडी गावात संताप व हादरलेले वातावरण पसरले असून, पोलिस पुढील तपास व आरोपीच्या कारवाईसाठी तत्पर आहेत.




















