जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. आज संपूर्ण कोकणात विविध अलर्ट देण्यात आले आहेत. तर मराठवाड्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याला मुसळधार पावसाची शक्यता असून अहिल्यानगर पुण्यातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
कुठे कोणता अलर्ट जारी?
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, जळगाव, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे.