
जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२५
गेल्या चार दिवसापासून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली आहे. मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे. या आंदोलनावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना जाऊन विचारा, असं वक्तव्य केलं होतं. यावरून आता मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“दोघे भाऊ चांगले, ब्रँड चांगला आहे. हा विनाकारण मराठ्यांच्यामध्ये पडत आहे. ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले, आम्ही विचारलं का? तुम्ही नाशिकला, पुण्याला, संभाजीनगरला येता आम्ही विचारलं का? फडणवीसांनी लोकसभेला तुमचा गेम केला. विधानसभेला तुमच्या मुलाला त्यांनीच पाडलं. तरी आम्ही विचारलं का? राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं आहे. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. कुचक्या कानाचं म्हणतात,” असे म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही? फक्त बैठका घेत आहेत,” असेही जरांगे म्हणाले. दुसरीकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. ‘राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं’, असं ते म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.




















