
जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३
देशातील अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी होत असून या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण देखील पाठवण्यात आले असून या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे साधे विधान परिषदेचे आमदार आहेत. केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील. राज ठाकरे असतील. यामुळे राज ठाकरे यांना बोलावले असेल, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला.
अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात मोठा फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये काढले होते तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले. राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.