
जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असताना ओढवलेल्या संकटाने शेतकऱ्याची चिंता अधिकच वाढली आहे. याचदरम्यान आता मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मंत्री संजय राठोड यांनी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करत हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेवा असल्याचे म्हंटले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल, असे सूचक विधान केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.




















