जळगाव मिरर | १९ जून २०२५
रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला कठोर निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. ‘ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी’ मोहिमेअंतर्गत, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आरपीएफ आणि जीआरपीने तीन दिवसांत पाच चोरट्यांना जेरबंद करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १५ जून रोजी कामायनी एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाची १४,००० रोख असलेली पर्स चोरीला गेली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अवघ्या काही तासांत अमीन यासीन शेख (३४) आणि शेख झाकिरुद्दीन (४२) यांना नाशिक रोड स्टेशनवरुन ताब्यात घेण्यात आले. १२,००० रोख जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल झाला. १६ जून रोजी अकोला स्टेशनच्या तिकीट बुकिंग हॉलमध्ये विजय रूपराव सरदार (४५, अमरावती) नावाच्या संशयिताला अटक केली. झडतीत त्याच्याकडून ४५,००० किमतीचा ओप्पो मोबाईल सापडला. सीसीटीव्हीमध्ये तो झोपलेल्या प्रवाशाचा फोन चोरताना स्पष्ट दिसला.
१६ जून रोजी नाशिक रोड स्टेशनवर एका प्रवाशाचा ८६,००० किंमतीचा आयफोन चोरीला गेला. शोध घेतला असता, सनील अंभोरे (२८, वाशीम) याला पकडून फोनसह अटक केली. १७ जून रोजी प्रेरणा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा १५,२५० किमतीचा मोबाईल आणि चार्जर चोरीला गेला. तपासाअंती, आरपीएफ जळगावने आरोपीला पकडून त्याच्याकडून ३७,५०० रोख व रिअलमी मोबाईल जप्त केला.
