
जळगाव मिरर | २१ जून २०२३
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार लवकरच वर्षपूर्ती साजरा करीत आहे. तर ठाकरे गटाने देखील वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. शिंदे यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी फोडले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेसह एकनाथ शिंदे यांच्या बंडावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आमदार सोडून जाणार आम्हाला माहिती होते. मात्र, शिंदे यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी फोडले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे खोटे बोलत आहे. माझे मतदार यादीत नाव आणि नंबर नव्हता. त्यांनी तेव्हाचा माझा फॉर्म पाहिला पाहिजे. यामुळे त्यांचे केंद्रीय मंत्रीपद आणि खासदारकी देखील जाऊ शकते, असा इशारा राऊत यांनी नारायण राणेंना दिला आहे. नारायण राणे म्हणाले होते की, एकदा संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी मला मातोश्रीवर बोलावले होते तेव्हा बाळासाहेबांनी आपल्याला संजय राऊत यांना खासदार करायचे आहे, फॉर्म भरुन टाक असे सांगितले. मी संजय राऊतांना दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्र घेऊन माझ्या ऑफिसमध्ये यायला सांगितले. सांगितल्याप्रमाणे ते आले सुद्धा, मी पाहिले तर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नव्हते. पण बाळासाहेबांनी दिलेला शब्द माझ्यासाठी नेहमीच अखेरचा असायचा. मी अधिकाऱ्यांना माझ्याप्रमाणे काय सांगायचे ते सांगितले आणि संजय राऊत यांच्या खासदारकीचा फॉर्म भरला.
फॉर्म छाननीच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय राऊतांचे नाव घेतले. लगेचच काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी हात वर केला आणि मी म्हटले, दाजी प्लीज. पुढे कोणाचे ऑब्जेक्शन नको. म्हणून संजय राऊत यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला, असा किस्सा नारायण राणेंनी सांगितला.





















