
जळगाव मिरर | ५ मार्च २०२६
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा येत असताना, सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्ष कडून चार उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडूनही उमेदवारांची नावे समोर येऊ लागली आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांच्या नावाला मागे टाकत ज्योती वाघमारे यांचे नाव पुढे आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर माध्यमांमध्ये त्यांनी सातत्याने पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही त्यांनी आक्रमकपणे पार पाडली आहे. त्यांच्या अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.
ज्योती वाघमारे या फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीतून पुढे आलेल्या नेत्या असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी सक्रिय काम केले आहे. यापूर्वी त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये कार्यरत होत्या. त्यांनी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. तसेच प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभांचे सूत्रसंचालन आणि संयोजनही त्यांनी केले होते. नंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत सक्रिय राजकारणात नवी भूमिका स्वीकारली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मजबूत वैचारिक आणि राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेही ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिली जाऊ शकते. दरम्यान, राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच या चर्चांना अंतिम स्वरूप मिळणार असले तरी सध्या राजकीय वर्तुळात शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















