जळगाव मिरर | १९ जून २०२४
चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० जणांना विषबाधा झाली. मंगळवारी सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक विषबाधेच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने घटनेचा उलगडा झाला. दरम्यान, यातील अनेक गंभीर रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच जळगाव येथील जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कमळगाव येथे चांदसणी, मितावली, पिंप्री तसेच आजूबाजूच्या खेड्यांतील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. त्या ठिकाणी अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पार्सल घरी नेले होते. यातील अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. यापैकी डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (७), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेल्या सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते.





















