जळगाव मिरर | १३ मार्च २०२५
राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांसह गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे बुधवारी 12 मार्च रोजी ही घटना घडली .चित्रा कविराज हाके (वय, २८), पृथ्वीराज हाके (वय, ७), स्वराज हाके (वय, दीड वर्षे) अशी मयतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हाके कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी रोडवरील मूळचे नान्नज येथील होते. कविराज उर्फ दत्तात्रेय हाके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह पत्नीच्या माहेरी वांगी येथे राहण्यास आले होते. त्यांना एक आठ वर्षाची मुलगी आहे. चित्रा यांची पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुले होती. पृथ्वराज हा जन्मतः गतिमंद होता. त्यानंतर स्वराज जन्माला आला. स्वराज देखील गतिमंदच जन्माला आला. दोन्ही पोरं गतिमंद जन्माला आल्याने चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती. दोन्ही मुलं गतिमंद जन्माला आल्याने चित्रा हाके अनेक दिवसांपासून निराश होत्या.
चित्रा हाके यांनी चिंतेतून टोकाचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांसोबत उडी घेतली. त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. शेळ्या चारणाऱ्या तरुणीने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला वेळ लागला. विहिरीत डोकावून पाहिल्यावर तीन वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली.