
जळगाव मिरर / २ डिसेंबर २०२२
सध्या देशभर गाजत असलेले दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणी राज्यात देखील घटनेचा निषेध म्हणून आंदोलनासह निवेदन देण्यात आले त्याची कसून चौकशी सुरु असतानाच धुळे येथे धक्कादायक प्रकार घडला आहे त्याची फिर्यादी तरुणीने पोलिसात दिली आहे.धुळे शहरातील एका २४ वर्षीय तरुणीने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे झाले, तू आमच्या विरोधात गेली तर तुझे ७० तुकडे करीन, अशी धमकी लग्नाशिवाय एकत्र राहात असलेल्या तरुणाने दिली असल्याची फिर्यादेत म्हटले आहे. आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावले, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आणि या तरुणाच्या पित्याने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असेही पीडिताने फिर्यादीत नमूद केले आहे.
बुधवारी मध्यरात्री दाखल झालेल्या या फिर्यादीनुसार, अर्शद सलीम मलिक नावाच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने २९ नोव्हेंबर रोजी ही धमकी या तरुणीला दिली. जुलै २०२१ पासून ते दोघे एकत्र राहतात. त्याआधी चार एप्रिल २०१६ रोजी तिचा पहिला विवाह झाला. २०१७ मध्ये तिला मुलगा झाला. सन २०१९ मध्ये तिच्या पतीचे रस्ता अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची एका अकॅडमी हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याची चित्रफीत बनवून तिला धमकावले. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै २०२१ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. ते करताना या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटमध्ये नेले.
तिथे त्याचा पिता सलीम बशीर मलिक याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चार महिन्यांनी अर्शदने तिला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. २६ ऑगस्ट २०२२ रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीम बशीर मलिककडून अनैसर्गिक अत्याचार होतच होते. दरम्यानच्या काळात अर्शदने तिचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली. तिचे तर फक्त ३५ तुकडे केले गेले, तुझे आम्ही ७० तुकडे करू, अशा शब्दात त्याने धमकावले असे पीडिताने फिर्यादीत नमूद केले आहे. उस्मानाबाद येथे असताना सोन्याची पोत मोडण्यास नकार देताच अर्शदने आपल्याला सायलेन्सरचे चटके दिले होते, असेही तिने नमूद केले आहे. याप्रकरणी अर्शद आणि सलीम या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.




















